Sunday, 27 September 2015

विस्तारलेला 'टिपकागद'

"ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे" असं मी सुरुवातीला म्हटलं खरं; पण 'डिसेप्शन पोईंट' वर मराठीत लिहिल्यानंतरही माझ्या असं लक्षात येतंय की इंग्लिश पुस्तकांवर इंग्लिशमध्ये लिहिणं जास्त सोयीस्कर आहे. 'टिपण काढणे' हा या ब्लॉगचा मूळ हेतू साध्य करताना ज्या त्या भाषेचा वापर अभिव्यक्तीसाठी आणि माझ्या व्यक्तिगत भाषाज्ञानाच्या समृद्धीसाठी अधिक प्रभावी ठरेल असं वाटतंय.

या व्यतिरिक्त, अलीकडे मला असंही जाणवलंय की, मी काही अतिशय सुंदर चित्रपट सुद्धा पाहिलेले आहेत ज्याबद्दल मला आवर्जून लिहून ठेवावसं वाटतं. शिवाय अनेकदा पुस्तकांवर बेतलेले चित्रपट पाहिलेले असतात. त्यात मग कधी पुस्तक वाचून त्यावर बेतलेला चित्रपट मुद्दाम शोधून पाहिलेला असतो, तर कधी चित्रपटाचं कथानक खूप भावल्याने मूळ पुस्तक शोधून वाचलं जातं. अर्थातच, पुस्तकाचं चित्रपटात रुपांतर करताना येणाऱ्या मर्यादांमुळे अनेक उत्तम पुस्तकांना न्याय मिळत नसल्याच्या भाबड्या समजुतीदाखल मी 'पुस्तकावर बेतलेला' प्रत्येक चित्रपट पाहिल्यानंतर मूळ पुस्तक वाचणं हे माझं कर्तव्य मानते आणि त्यादृष्टीने प्रयत्नसुद्धा करते. 'ओनलाईन', 'सोफ्टकॉपी', 'डाउनलोड्स', असल्या नावाखाली पुस्तकं 'हाताशी लागणं' माझ्यासाठी अत्यंत सोयीचं झालेलं असल्याने माझे हे कोड पुरवलेही जात आहेत.

म्हणूनच, 'टिपकागद' हा केवळ पुस्तकांची टिपणं काढण्याचा प्रयत्न न ठेवता, सर्व प्रकारच्या 'साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न' करण्याचा विचार अनेक दिवसापासून मनात घोळत आहे. त्यावर काम तर चालू होतंच, आता यापुढे दृष्य कृती करतानाच, 'टिपकागद' वर पुस्तकांसोबत चित्रपटावर सुद्धा लिहिलेल्या पोस्ट पाहायला मिळू शकतात. शिवाय, पुस्तक आणि त्यावर बेतलेला चित्रपट याचं टिपण एकत्र घेणं, हे केव्हाही उत्तम. त्यात थोडी तुलनासुद्धा असेल आणि थोडी सोयसुद्धा!

तरी, माझ्यासारख्याच, वाचन मनापासून एन्जॉय करणाऱ्या मित्रांनो (म्हणजे मित्र आणि मैत्रिणींनो!) चला परत एकदा भिडूया पुस्तकांना, नव्या उत्साहाने आणि नव्या माध्यमासह!

Wednesday, 10 June 2015

युगंधर

"मृत्युंजय" बद्दल आधी लिहावं आणि नंतर "युगंधर" बद्दल, असं डोक्यात ठेवून मी गेले सहा महिने थांबले होते.. पण आता मात्र गप्प बसवत नाहीये अगदीच.

शिवाजी सावंत यांची एकूण ३ पुस्तकं मी वाचलीयेत. सगळी "Epic"! मृत्युंजय, छावा, आणि आता युगंधर. मृत्युंजय वाचलं तेव्हा फक्त 'एक प्रसिद्ध पुस्तक' आणि 'आवर्जून वाचलं पाहिजे असं पुस्तक' असं बोलबाला ऐकून वाचायला घेतलं. मग सावंतांच्या शैलीची छापच उमटली मनावर. (मृत्युंजय बद्दल वेगळं लिहायचंच आहे.) त्यानंतर संभाजीराजे यांच्यावरची धूळ झटकणारं (खरंतर त्यांच्यावरचे डाग स्वच्छ करणारं) पुस्तक अशी "छावा" ची कीर्ती वाचली आणि ते सुदैवाने घरात आलेलंच असल्याने पटकन वाचून सुद्धा झालं ("छावा" हा अर्थातच अजून एक स्वतंत्र विषय!). 'युगंधर'ची कीर्ती कानावर येत होती पण वाचनाचा योग जमून येत नव्हता. welll, आधीच अशी फार वर्षं वाट पाहिलेली असल्याने असेल पण 'युगंधर' हातात आल्यापासून साधारण १६ तासात ते सलग वाचून झालं (जेवणखाण ज्या त्या वेळेत हो!). 



युगंधर वाचण्याआधी यावर
एक नजर टाकायलाच हवी!
प्रस्तावनेपासून सुरुवात करायची असा माझा शिरस्ता. कुसुमाग्रज लाडके कवी होतेच (अजूनही आहेत किंबहुना) पण या 'युगंधर'मागे त्यांचं मोलाचं प्रोत्साहन आहे हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पट वाढला. शिवाजी सावंतांनी पुस्तक लिहिताना किती वेळ आणि किती वेळा break घेतला ते वाचून वाटायला लागलं की या मानाने माझा हे पुस्तक 'वाचायचा' योग नक्कीच लवकर आलाय. (LOL!) इतक्या चिकाटीने, इतकी वर्षं; अभ्यास, काम करणे आणि ते ही अशा प्रकारचं प्रतिभाजन्य काम... म्हणूनच अशा कलाकृती काळात अमर होऊन जातात बहुतेक! (वाक्य जरा जड झालंय, पण नाइलाज!)

'युगंधर' वाचताना मला अनेक ठिकाणी 'मृत्युंजय' चा sequel वाचत असल्यासारखं वाटत होतं. पण त्याला कदाचित पर्याय नसावा. काही ठिकाणी तर चक्क "वाचकाने आधी मृत्युंजय वाचलं असणार" असं सरळ गृहीत धरलेलं जाणवतं. पण मला वाटतं, हजार पानाचं पुस्तक वाचायला घेणारा वाचक किमान इतका अभ्यासू आणि रसिक असण्याची अपेक्षा हा उलट वाचकावर दाखवलेला विश्वास आणि त्याचा सन्मानच आहे.

मुळात मला 'युगंधर' 'भयंकर' आवडला त्याला कारण म्हणजे पहिल्यांदाच कुणा लेखकाने, श्रीकृष्णाकडे एक 'शाश्वत', 'मर्त्य' आणि 'मानव' म्हणून पाहत कथानकाची मांडणी केली आहे. त्याचे काही 'चमत्कार' कायम ठेवताना सुद्धा त्याच्यातला 'मनुष्यजन्म' जपला आहे. मला वाटतं, "दशावतार" मुळात अपेक्षित आहेत ते असेच.
त्यातल्यात्यात श्रीरामाच्या वागण्यात (आणि कथेत) आपल्याला बरेच मानवी संदर्भ सापडतात; पण बिचारा 'पूर्णपुरूष' श्रीकृष्ण मात्र आपण फारच परका, अमानवी करून टाकला आहे. भागवत पुराण असो व अजून कुठलं पुस्तक, श्रीकृष्णाचे चमत्कार गाण्यातच आपल्या लेखकांना धन्यता वाटत आली आहे. युगंधर मात्र या कसोटीवर पूर्ण वेगळा सिद्ध होतो. (अर्थात तसं प्रस्तावनेत स्पष्ट म्हटलेलंच आहे आणि त्या शब्दाला पुस्तक जागतं सुद्धा.)

श्रीकृष्णाचे आणि महाभारतातील इतर चमत्कार (द्रौपदी वस्त्रहरणासारखे प्रसंग, संजयच्या दिव्यदृष्टीचा प्रसंग, इ.) 'युगंधर' ला वर्ज्य नाहीत. पण श्रीकृष्णाचे गोकुळातील पराक्रम, त्याचे सर्वज्ञ असणे - त्याचे सजग आणि उत्कृष्ट गुप्तहेरखाते, त्याचे रुक्मिणीसोबतचे नाते, स्यमंतक घटनाक्रम, त्याचे प्रथम आठ विवाह, रुक्मिणीच्या आणि राण्यांच्या जबाबदाऱ्या, अर्जुनासोबत आणि कर्णासोबतचे संवाद, भगवद्गीता, युद्ध, युद्धानन्तरचा काळ, यादवांचा अंत या सगळ्यांमध्ये श्रीकृष्णाचे 'दिव्य' असण्यापेक्षा,  राज्यकर्ता आणि माणूस म्हणून वैचारिक दृष्ट्या प्रगत असणे प्रत्येक वेळी प्रतिबिंबित होते.

मथुरेचा, द्वारकेचा, भारतवर्षातील इतर प्रदेशांचा आणि राज्याभागांचा भौगोलिक संदर्भ अभ्यासपूर्ण असल्याचं जाणवतंच पण पुस्तकातले नकाशे सहज औत्सुक्याने पहिले जातात, त्यांचे संदर्भ लावले जातात; दुर्लक्षित केले जात नाहीत, हे महत्त्वाचं. प्रत्येक निवेदक आधीच्या घटनाक्रमाचा थोडक्यात पण आपल्या दृष्टीकोनातून आढावा घेतो आणि मगच पुढे सरकतो. पण या सगळ्या भानगडीत कधी कधी (थोडासा) कंटाळा येऊ शकतो (म्हणजे उगाच 'आपण सगळ्यांच्या बाजू ऐकून निकाल द्यायचा आहे' अशी भावना व्हायला लागते). पण त्यासुद्धा, काही निवेदक काय म्हणतात याबद्दल उत्सुकता वाटत राहते - दारुक, कर्ण किंवा द्रौपदी सारखे... दारुकाचे निवेदन कृष्णाचे सेवकवर्गाशी असलेले वागणे निर्देशित करतेच शिवाय त्याची अश्वतज्ञता आणि म्हणून कुशल सारथी अशी कीर्ती (जी सहसा इतर कोणत्याही महाभारताच्या पुस्तकात युद्धापूर्वी उल्लेखात येत नाही!) ती दर्शवते. कर्णाचे निवेदन मृत्युंजयच्या जवळ जाणारे असले तरीही वेगळे (निवेदकाचे कथेच्या मध्यवर्ती स्थानापासूनचे अंतर वेगळे असल्याने असावे बहुतेक). द्रौपदीचं निवेदन बऱ्याच अर्थांनी युगंधरमध्ये महत्त्वाचं आहे. आणि तिने केलेल्या पांडवांच्या स्वभावांवरील परीक्षणाशी मी तरी फारच सहमत होते. रुक्मिणीचं निवेदन हा मला वाटत 'युगंधर'ला 'मृत्युंजय'पासून वेगळं नेणाऱ्यापैकी एक महत्त्वाचा पैलू. तिचा श्रीकृष्णाकडे बघण्याचा दृष्टीकोन 'पतीपरमेश्वराय..' असला तरीही त्यांच्या नात्यातला बंध सुखावणारा. यादवांचा अंत किंचित अतिरंजित वाटतो, पण किंचितच आणि त्यातसुद्धा असलेली तर्कशुद्धता अपूर्व आहे.

भगवद्गीता तर इतक्या सुरेख आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य (कथा-कादंबऱ्या वाचून धन्य होणाऱ्या) वाचकाला सुद्धा गीता-सार वाचल्याचा आनंद आणि ज्ञान मिळावं. कादंबरी म्हणून मांडताना सुद्धा गीतेचं महत्त्व कायम राखत ती टाळली तर नाहीच पण उगाच क्लिष्टदेखील केलेली नाही.

पण माझ्या मते, सर्वात सुंदर उत्तरे मिळतात ती दोन शंकांना. 
मला फार पूर्वीपासून (अगदी भौतिक) प्रश्न होता की श्रीकृष्ण द्रौपदीच्या स्वयंवराला कसा काय आमंत्रित होता? (i mean, स्वयंवराचे आमंत्रित हे त्यात भाग घेण्यासाठीच असतात असं आपलं माझं मत झालेलं... आणि "द्रौपदीसी बंधू शोभे.." हा विरोधाभास!) आणि दुसरं म्हणजे, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न; सोळा हजार राण्या??????? (काहीही काय!) पण या दोन्हीला युगंधरने दिलेली उत्तरं चपखल आणि वादातीत आहेत. ते ही श्रीकृष्णाचा मानवजन्म आणि त्याचा मोठेपणा दोन्ही सांभाळून. (काही नाही तर यासाठी तरी - हजार पानाचं असलं तरी ही - युगंधर आवर्जून वाचावं!)

प्रसंगी, 'उंगली टेढी करणारा' श्रीकृष्ण मला (त्यासाठी) आधीच आवडत होता; आणि मुलगी म्हणून मला (पत्नीला परित्यक्ता जगायला लावणाऱ्या) श्रीरामापेक्षा, (सोळा हजार स्त्रिया सोडवणारा) श्रीकृष्ण सुद्धा आवडत होताच. पण त्याहीपेक्षा, या प्रश्नांची अशी काही उत्तरे देऊन जाणारा युगंधर अधिकच आदरणीय होतो. आणि फक्त तेवढी उत्तरेच नाही तर त्याचा 'स्त्रीपुरुषसमभाव' यापेक्षा कितीतरी खोलवर जाणारा, अधिक गंभीर आणि अधिक नित्यसहज आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांनीच खरंतर त्याच्या 'सोळा हजार स्त्रिया' आणि पूर्ण'पुरूषत्व' यापलीकडे जाऊन त्याच्यातले हे समभावाचे 'पूर्ण'गुण समजून घेण्याची आत्यंतिक गरज सध्याच्या घडीला दिसते आहे. श्रीकृष्णाच्या मोरपिसापासून ते श्रीवत्स चिह्न आणि शंख, चक्रापर्यंत प्रत्येक गोष्टीचे अधिक तर्कशुद्ध समर्थन हे 'युगंधर'चं अतिमहत्त्वाच बलस्थान आहे.

"स्त्री", "पुरुष" या संकल्पना माणसांना लागू होतात (देवांना केवळ देव आणि देवी एवढा सम्बोधनातला दुजाभाव स्वीकृत आहे असं दिसतं) याचे दाखले आपल्या पौराणिक साहित्यात जागोजाग आढळतात. त्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाच अतिमानुष (किंबहुना अमानुष) पूर्णपुरूषत्व मला फार काळ खटकत होतं. पण शिवाजी सावंतांचा श्रीकृष्ण "दैवी" पेक्षा "मानवी" स्वरुपात जास्त असतो. सगळ्या समस्यांना तो मानुष उत्तरं देतो. प्रत्येक वेळी सिद्ध करतो की तो 'पूर्णपुरूष' म्हणवला जातो कारण तो प्रगत असूनही 'मनुष्य' होता.

राधेचा सखा, द्रौपदीचा सखा बंधू आणि बलरामासाठी लहान, पती, मुलगा, एक निस्पृह कार्यकारी राज्यकर्ता, एक मार्गदर्शक, युद्धनीतीज्ञ, आणि एक विरागी सुद्धा.

प्रत्येक रुपात युगंधर लोभावतो तो एक माणूस म्हणून. 


Tuesday, 17 February 2015

Symbology पलीकडचे.......

Dan Brown च्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांना पालथं घातलाय मी. सुप्रसिद्ध (किंवा वादग्रस्त) The Da Vinci Code पासून सुरुवात करून मग, Digital Fortress, Deception Point, Angels and Demons, The Lost Symbol, अगदी गेल्या दोन वर्षात आलेलं Inferno....... सगळे, (hard copy-soft copy) कसेही करून... The Da Vinci Code आणि Angels and Demons वर आलेले चित्रपट पाहून त्यावर माझी मतं सुद्धा देऊन झाली (नक्की पहावेत!).  आणि Angels and Demons तर इतकं सुरेख होता, की मी मनापासून वाट बघतेय त्याच टीमतर्फे Deception Point वर असा किंवा अजून चांगला चित्रपट येण्याची.

मध्यंतरी पुन्हा एकदा योग आला काही वर्षापूर्वी वाचलेलं "Deception Point" परत वाचायचा. अर्थात ते एका रात्रीत वाचून संपवला गेलं. Dan Brownची सगळी पुस्तकं वाचल्यानन्तर मी अशा निष्कर्षाप्रत आले होते, Deception Point मला सगळ्यात जास्त आवडलंय. त्याचं पारायण केल्यावर आता माझं हे मत अगदी पक्कं झालंय.

तशी ही सगळीच fictions आणि सगळीच श्वास रोखायला लावणारी. अत्यंत रसभरीत कथानक आणि ते तितक्याच प्रभावीपणे पुढे नेणारी. Robert Langdon Adventure नसलेल्या Dan Brownच्या दोन्ही पुस्तकांना (Digital Fortress आणि Dception Point) स्वतःचा एक ठसा आहे. त्यातही, Deception Point एका वेगळ्या जगात घेऊन जाणारं. चर्च आणि symbology (चिह्नशास्त्र) बाहेरचं, अर्धवट माहित असलेलं जग, त्यामुळे डोळ्यासमोर प्रसंग यायला अगदी सोपं, पण तरीही त्यातला अज्ञात धडकी भरवणार.

मुळात मला पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राचं अपार आकर्षण, त्यात जेव्हा Deception Point सारखं पुस्तक हातात पडत, तेव्हा पर्वणीच. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली note, की हे सगळं तंत्रज्ञान, या संस्था-संघटना, हे हुद्दे , अस्तित्वात आहेत; मला वाटत, अजून गंभीर करते आपल्याला.
(मला बायोलॉजी थोडंफार कळत असल्याने असेल कदाचित पण एकूणच) त्यातले सूक्ष्मजीवांचे, Bioluminiscence चे संदर्भ सुद्धा चटकन लक्षात येतात. डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहू शकतात. (हा तर मला वाटतं, पुस्तक वाचनाचाच सगळ्यात आकर्षक भाग असतो)
नाही म्हणायला Goya दृष्यमान करायला जरा कठीण गेली मला. (Boat या प्रकाराच अज्ञान कारणीभूत असावं याला.)

कुठे एकही पात्र अनावश्यक येत नाही, किंवा जात नाही. अर्थात, Marjori Tench च जाण थोडं अनपेक्षित होतं मला.. म्हणजे "तिला का???" असं काहीसं.. पण प्रत्येक घटनेचा कथेत संदर्भ राहतो; आणि त्याहीपेक्षा मला महत्त्वाच वाटत म्हणजे कथा इतकी चित्तवेधक प्रकारे पुढे जात राहते की मागच्या घटनेचा संदर्भ जिथे असेल तिथे तो लक्षात यायला परत मागे जावं लागत नाही... (नाहीतर कधी कधी म्हणजे परत मग आधीचा प्रसंग वाचवा लागतो!) कथेचा ओघ सलग राहतो आणि आपण फक्त पुढेच सरकत राहतो.

सर्वाधिक अनपेक्षित आणि वेधक (नक्कीच अनुभवावी अशी गम्मत) म्हणजे नाव Deception Point असलं तरी प्रत्यक्ष Point of Deception सुद्धा कथेच्या ओघासह पुढे पुढे सरकत राहतो, बदलत राहतो......

Dan Brown म्हटलं की Robert Langdon ची साहसं सर्वात आधी डोळ्यापुढे येतात. Symbology हे या कथांचं बलस्थान. पण बलस्थान सोडून बांधलेली Dan Brown ची ही कथा मात्र अतिशय खिळवून ठेवणारी आणि म्हणूनच आवर्जून वाचावी अशी.

Saturday, 1 November 2014

बंडखोरी

 
anti-मुसलमान ज्वलंत पुस्तकं नेहमीच पचनी पडतात असं नाही. पण कधी कधी काही गोष्टी कबूल कराव्याच लागतात. "मोपल्यांचे बंड" वाचलं तेव्हा त्यातल्या वास्तवाने मला हलवून टाकलं. 'लज्जा', 'रक्त लांच्छन', 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो', अशी पुस्तक वाचताना किंवा 'पिंजर' सारखा चित्रपट पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी. पण "मोपल्यांचे बंड" अजून वेगळं वाटलं. त्यातल्या सावरकरी भाषेचा परिणाम असावा कदाचित; पण करुणा वाटण्याऐवजी चीड आली. हिंदू षंढपणाची. आणि कौतुक वाटलं मुस्लिम समाजाच्या एकीचं.


पुस्तक लिहिलंय ते "मला काय त्याचे" ही प्रवृत्ती, हा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आणि मला वाटतंय की ते होईल सुद्धा. मित्रमंडळातही मुसलमान असतील तर असू द्यावेत पण जोवर ते इतरांच्या धर्माबद्दल सहिष्णू आहेत तोवरच. आजूबाजूला चाललेल्या घटनांना सामान्य समजून मागे टाकताना आणि दुर्लक्ष करताना त्यांचं स्वरूप भीषण कसा होत जातं याचा प्रत्यय हिंदू धर्माने अनेकदा घेतलेला आहे. "मोपल्यांचे बंड" असाच एक घटनाक्रम फक्त वाचून दाखवतं, पण काहीही न गाळता, न टाळता.

हिंदूंनी कधी मुसलमानांना किंवा क्रीश्चनांना हिंदू धर्मात परावर्तीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आढळत नाही. मुसलमान हिंदू झाल्याच एकच उदाहरण माझ्याही समोर आहे; ते आहे महम्मद कुलीखान जेव्हा "परत" नेताजी पालकर झाले ते. पण तेसुद्धा मुळातल्या हिंदूलाच परत हिंदू करण्यासाठी केलेलं.
हिंदू राजे आणि नेते याबाबत भलतेच उदार. पण या औदार्याचा इतर धर्मांनी नेहमीच गैरअर्थ घेतलेला दिसतो. हिंदू जबरदस्ती करत नाहीत म्हणजे कोणीही येउन आम्हाला टपली मारून जावं असं नाही. पण इतर धर्म हे सोयीस्कर प्रकारे विसरलेले दिसतात. ताज महालापासूनच हिंदू वैदिक वास्तूंना आणि वस्तूंना आपल्या नावावर करून श्रेय लाटण्याचे प्रकार असंख्य वेळा झालेले आहेत.

"मोपल्यांचे बंड" साठी स्थळ आहे ते दक्षिण भारतातील. उत्तमोत्तम आणि एकाहून एक प्रसिद्ध हिंदू देवस्थानं असलेल्या, पण तरीही जेथील हिंदूंच्या वेदना सहजपणे उत्तरेला ऐकू जात नाहीत अशा प्रदेशात. हा ही योगायोग म्हणायचा बहुतेक. कित्येक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टी किती लोकांनी कानावरसुद्धा घेतल्या असतील माहित नाही. नमूद करणे दूरच.

स्वातंत्र्याच्या आसपास सीमेवर अशा कित्येक घटना घडलेल्या अनेकदा लोकांसमोर आलेल्या आहेत. या न त्या अनेक माध्यमातून. पण स्वातंत्र्यापूर्वीच जन्म झालेल्या आणि वेग घेणाऱ्या घटनांना हिंदू समाजाने कधी मनावर घेतलंच नाही, हे इतक्या परखडपणे सांगायला सावरकरच हवेत.

आम्ही स्वतः दुसर्यांचा खोड्या काढत नाही याचा हिंदूंना सार्थ अभिमान आहे; यावर पुस्तक सरळच बोट ठेवतं. पण कमीतकमी इतरेजन खोड्या काढीत असतील तर ते कानाआड करून आणि हातावर हात धरून स्वस्थ तरी बसू नये. बांग्लादेशी हिंदूंच्या व्यथा समजून घेऊन व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका मुस्लीम लेखिकेला भारतात शरण घ्यावी लागते, आणि तरीही आमचा हिंदूबहुल देश त्यामागचं गांभीर्य समजून घेऊ शकला नाही. 

अर्थात "मोपल्यांचे बंड" हे हिंदूंच्या निष्क्रियतेइतकंच त्यांच्यातील स्वार्थी दुहीवर केलेलं विधान आहे. इतिहासाची साक्ष देऊन हिंदूंच्या धर्माभिमानाला आणि एकजूट शस्त्रसज्जतेला साद घालणारं रणशिंग आहे जणू.
सावरकरी भाषेमुळे त्याला धार आहे, स्पष्टवक्तेपणा आहे, नेमकेपणा आहे आणि अचूक नेमही आहे.

सोनेरी चंदेरी


पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाची ओळख करून देताना म्हटलंय, "सेलिब्रिटी मधलं माणूसपण शोधण्याचं, टिपण्याच आणि शब्दांच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब ललिता ताम्हणे  यांना साधलंय." पुस्तकाला याचा "बोलका प्रत्यय" म्हटलंय. जे वाचताना आपल्याला शंभर टक्के पटत. किंबहुना पुन्हा पुन्हा पटत राहत.

मुळात चंदेरी दुनियेमागच्या कथांमध्ये सामान्यांना भयंकर रस. त्यात प्रस्तावनेतच सरळ सरळ सांगून टाकलंय की यात गुपितच गुपितं आहेत. पण जसजसं एकेक पान उलटत गेले तसं माझ्याच लक्षात आलं, गुपितं समजण्याची हौस हा किती क्षुद्रपणा आहे. त्या देखण्या चेहऱ्यामागची तितकीच किंवा त्याहीपेक्षा देखणी माणसं नजरेस पडू लागली आणि मी आपोआप त्यात हरवत गेले. मीनाकुमारी, दीप्ती नवल यांच्या कविता त्यांच्या अभिनयाइतक्याच सुंदर असतील असं मला माहीतच नव्हतं. खरं तर त्यांच्या कविताही आहेत हेच माहित नव्हतं.


लोग एकही नजरसे देखते हैं 
औरत और मर्द के रिश्ते को 
क्योंकी उसे नाम दे सकते हैं ना 
नामों से बंधे बेचारे यह लोग 

त्यांच्या प्रेमाच्या कथा ऐकलेल्या होत्या आणि त्याचं नवल, कुतूहल, आकर्षण, कौतुक असं सगळं असून सुद्धा त्यांच्या त्या प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलून गेला. या सगळ्याच्या बरोबरचा आणि पलीकडचा एक आदर आला.

कलाकार मूडी असतात, लहरी असतात असं काय काय ऐकत आले होते मी. चुकून एखादेवेळी विचार यायचा त्यांच्या माणूस असण्याचा; पण तो तितकाच चुकार असलेला विचार, क्षणात विरूनसुद्धा जायचा. या पुस्तकाने मात्र त्यांच्या माणूसपणाचं भान ठेवण्याची खात्री पटवली आणि महत्त्वसुद्धा. त्यांच्या स्वभावाला असलेल्या आणि  क्वचितच सामान्यांच्या समोर आलेल्या सुंदर छटा सहज लक्षात आणून दिल्या. त्यांच्या लहरी, त्यांचे मूड्स, यामागे त्यांचीही काही अतिशय अस्वस्थ कारणे असू शकतात; अगदी जशी तुमची-आमची असतात अशीच. त्यांच्या आयुष्यालाही तसेच चढ उतार असतात. त्यांनाही तशीच जिद्द ठेवावी लागते. आणि एवढ्या खटाटोपानंतरही, कधी कधी त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो.

असं म्हणतात, "Winner is just like everyone else, only the one who didn't quit". या पुस्तकाने माझी या वाक्याशी एक नवी ओळख करून दिली. मनाला भावणाऱ्या या सेलेब्रिटीजचे हे अगदी वेगळे पैलू. म्हटलं तर जिद्दी म्हटलं तर हळवे. मानी. वक्तशीर, शिस्तीचे, वचन पाळणारे आणि दिलदारपणे अटी मोडणारे सुद्धा. कलाकार आहेत म्हणून की कोणास ठाऊक, पण सगळेच संवेदनशील. 


जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना 
तब कुछ भी कहने को जी नहीं चाहता 

खरं तर सगळेच लेख त्या त्या सेलेब्रिटीजना उलगडत नेणारे आहेत पण त्यातही, स्पर्शून जाणारे म्हणजे "कमाल अमरोही", "सायरा बानू", "हेमा मालिनी" "रेखा" आणि "रंजना". 
यांच्या स्वभावाच्या अशा बाजू नजरेस पडून थक्क झाले मी. माणूस असाही असू शकतो, इतका मोठा..?? दिसतो, वाटतो किंवा भासतो, दाखवतो त्यापेक्षा इतका वेगळा...
वाचकांच्याच सुदैवाने हे सारे लोक लेखिकेशी जवळीकीने, मोकळेपणाने बोलू शकले असं म्हणायला हवं खरं म्हणजे. कदाचित यामागे ललीताजींची मुलाखतीची पद्धत असावी. फक्त एक "स्टोरी" म्हणून कलाकारांकडे पाहण्याऐवजी, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक तसच व्यावसायिक आयुष्याकडे त्या पाहत आल्या आहेत. मुखवटे बाजूला ठेवून एखाद्याला समजून घेण्यासाठी काही तासांपेक्षा कमीत कमी काही दिवस देणं आवश्यक आहे; किंबहुना, तसं समजून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल जाहीर विधान करणं अयोग्य आहे हे त्यांनी नेहमीच सांभाळलेल दिसतं. 

स्मिता पाटील, नूतन, तनुजा, मीनाक्षी शेषाद्री, दीप्ती नवल, गौतम राजाध्यक्ष, यांच्यावरील लेखातून ललीताजींची त्यांच्या बद्दलची आत्मीयता आणि मैत्री स्पष्ट जाणवत राहते. जवळच्या मित्रमैत्रीणींबद्दल बोलताना त्यांचाही हात सैलावतोच. या 'मुलाखतीपलीकडच्या' माणसांमध्ये आपणच आपल्या नकळत गुंतत जातो. त्यांच्यातले कलाकार आणि सेलेब्रिटीज मागे राहून त्यांच्यातलेही साधेसरळ मैत्र आपल्या नजरेस पडू लागतं. हे पुस्तक या सगळ्यांच्या प्रसिद्धीच्या प्रवासाचं, त्यांच्या भावनिक चढउतारांच आणि कष्टाचं सुद्धा साक्षीदार बनते, आणि आपल्यालाही बनवत. चंदेरी दुनियेतल्या माणसांचं हे सोनेरी पाणी पाहून एकदम खूप छान वाटायला लागतं.

ही माणसं काही अजूनही आहेत, काही मात्र निघून गेलेली. प्रेरणाही देतात आणि संवेदनाही. "They should get their dues" ही भावनाही. लेखांच्या शेवटी मात्र मनात "माणूस" म्हणूनच घर करतात.
मीनाकुमारीच्या या ओळी सुरुवातीलाच भेटतात आणि शेवटानंतरही सोबत करतात.


चाँद तन्हा है आसमां तन्हा 
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 
जिन्दगी क्या इसीको कहते हैं 
जिस्म तन्हा है और जां तन्हा 
राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा 

Sunday, 27 October 2013

लाडकी

सातवी इयत्तेमध्ये प्रथम भाषा मराठी घेऊन शिकताना एका सुंदर मुलीशी ओळख झाली.. गोपाल नीलकंठ दांडेकरांची मानसकन्या "शितू". तेव्हाची ती अर्थात नुसतीच तोंड ओळख. तिला संपूर्णच जाणून घेण्याची उत्सुकता तर अपार होती पण योग काही येत नव्हता. शितूच्या ओढीने गोनीदांच्या इतर अनेक कादंबऱ्या वाचल्या गेल्या. त्यांच्या शैलीवर अक्षरशः प्रेम जडलं. पण शितूच्या भेटीचा योग काही येईना. मध्यंतरी अनेक लोक माझं गोनीदा प्रेम ऐकून "मग तू शितू वाचली असशीलच" असं विचारायचे मला आणि प्रत्येक वेळी नकार देताना जीव अगदी जळायचा माझा.


हल्ली हल्लीच मात्र आमच्या पत्रिका जुळून आल्या आणि एका पुस्तक प्रदर्शनात शितू नजरेस पडली. मग काय शितूला घरी न आणायला काही कारणच नव्हतं आणि एकाच बैठकीत जेमतेम दोनशे पानांची ती "गाथा" वाचून झाली. खरंतर गोनीदांची शैली आणि शितूची कहाणीच अशी आहे की बैठक मोडताच येत नाही. कोकणच्या मातीवर घडणारी त्यांची ही कथा कोकणाला सुद्धा त्यांचा वेगळा स्पर्श देऊन जात असल्याचा भास होतो. लाल मातीवरच्या एकेका बारकाव्याच अचूक निरीक्षण अनुभवताना सुखद आनंद होत राहतो.

शितूच्या प्रस्तावनेत गोनिदांनी शेवटी म्हटलं आहे "चित्तास अति हळुवारपण आणौनिया शितू वाचावी. ती माझी अत्यंत लाडकी परंतु जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे" आणि या त्यांच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी शितू वाचताना आपल्याला काही करावंच लागत नाही. शितूची कहाणी जशी पुढे सरकत जाते तसतसं मन आपोआप हळुवार होत जातं. तिचा स्वभाव सोशिक तर आहेच पण त्यात कुठेही सहन केल्याचा आव नाही. तिचे भोग आपल्या मनाला भिडतात पण तिच्याचमुळे ते सहजही होऊन जातात. 

फार कमी कादंबऱ्या वाचताना मी रडले आहे. शितू अर्थातच त्यात अंतर्भूत होते. शितू वाचताना कुठेच हुंदका येत नाही; डोळे मात्र शितू वाचून पूर्ण झाल्यावरही झरत राहतात. शितूची आठवण इतकी मनावर रेंगाळते की नंतर कित्येक तास मनावरचा पगडा जात नाही.

प्रेमभावनेचा असा पैलू नजरेत येण्यासाठी गोनीदांचीच दृष्टी हवी आणि तो इतरांना दृष्यमान करवण्यासाठी त्यांचीच भाषा हवी. त्यांचा "धन्यतेचा आनंद" शितूच्या एकेका वाक्यात ओतलेला आहे. त्यांच्या "वेदनाशून्य आसवांनी" शितूचा एकेक अध्याय ओथंबलेला आहे. शितू म्हणजे खरोखरंच गोनीदांची सर्वात आगळीवेगळी अशी निर्मिती आहे.

खिळवून ठेवणाऱ्या कित्येक कादंबऱ्या पहिल्यांदाच इतक्या एकाग्रचित्ताने वाचल्या जातात की दुसऱ्यांदा वाचण्याची गरजच उरत नाही. फारफारतर त्यांचा ठराविक प्रसंग उघडावा आणि वाचावा असं होतं. शितूच्या बाबतीत मात्र मी एकदा ती पूर्ण केली, पहिल्याच वेळी तिचा शब्द न् शब्द स्मरणात कोरला गेला. पण तरीही पुनःपुन्हा त्यानंतर मी ती वाचली आणि प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत वाचली.

शितू वाचण्यासाठी मला फार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण आता मात्र तिच्या पारायणाने कधीच तृप्ती होऊ नये इतकी ती लाडकी झाली आहे.

Wednesday, 11 April 2012

MALTOVA, BOURNVITA, वगैरे....

त्या वाचनाला खरं तर खूप मोठं 'वाचनमूल्य' नसायचं. "आपके बच्चे को बनाये, taller and stronger and sharper" अशा प्रकारचा काही प्रकाशकाचा वायदा/दावा नसायचा. "बच्चेको" वाचनाची चटक लावणं हा आणि एवढाच त्याचा सद्हेतू आणि सदुपयोग. तो मात्र १००% सफल!!
घ री पहिलं मासिक यायचं - अर्थात आम्हा मुलांसाठी असलेलं पहिलं- ते म्हणजे "चांदोबा". बरं, ते यायचं म्हणजे अगदी खास पाहुण्यासारखं. म्हणजे stand वरच्या पेपर-पुस्तकवाल्याकडून जाऊन आणावं लागायचं. आमच्या 'धावे'च्या अंतरात ते बसत नसे. मग बाबांच्या मागे धोशा लावायचा आणि पुरेशा उत्कंठावर्धक प्रतीक्षेनंतर हातात पडलेला चांदोबाचा अंक जेमतेम अर्धा-एक तास पुरायचा. घरात त्यामागून येऊ लागलेल्या बाल-मासिकांच्या मानाने चांदोबाला भरपूर "पोषणमूल्य" होतं. फोटोवरून चारोळी करण्याच्या स्पर्धा, प्रत्येक अंकात वेगवेगळ्या वनस्पतींची तसंच प्रदेशांची माहिती, असं बरंच "पौष्टिक" मालमसाला असायचा. (अर्थात; गोष्टी वाचून संपल्याशिवाय मी बाकी कशाच्या फंदात पडायचे नाही.) त्यातल्या सगळ्याच गोष्टींना तसं तर अलिखित तात्पर्य असायचं, पण त्यातही एकदम वास्तववादी भाष्य करणारे विक्रम-वेताळ माझ्या खास आवडीचे. चांदोबातल्या विक्रम वेताळानी पंचविशी ऐवजी दोनशे पन्नाशी सुद्धा पार करून झालीय (हल्लीच चांदोबाचा कितीतरी 'शे'वा अंक वाचला मी!!!) पण अजूनही ते तितकेच ताजेतवाने असतात. काही दिवसांपूर्वी बाबांच्या नजरेला चांदोबाचा सर्वात नवीन अंक पडला, आणि आमचा हट्ट आठवला म्हणून कि काय, ते तो घेऊनही आले. चांदोबाने आपला दर्जा खूपच टिकवल्याच पाहून बर वाटलं.
बाल-मासिकांशी अजून जास्त मैत्री झाली ती काकांकडे येणाऱ्या इतर मासिकांमुळे. त्यातल्या त्यात “चंपक” जरा जास्तवेळा भेट द्यायचं, “ठकठक” मात्र त्यामानाने अगदीच “ईद का चांद” होतं. पण चांदोबाच्या आकाराशी या दोन्हीच साम्य असलं तरी ती दोन्ही अगदी “बाल” मासिकं वाटायची मला. म्हणजे निखळ मनोरंजनाला (आणि त्यानिमित्ताने वाचनाची आवड लावण्याला) त्यांचं सर्वस्व वाहिलेलं होतं. उगीच आपले चुकार कोडी, चित्रातले फरक ओळखा वगैरे असायचे. सिद्धार्थकाका, चित्रे पूर्ण करून रंगवा; चंपक मध्ये सामान्यज्ञान पण असायचं. अजूनही असतं. पण माझ्या मताने तरी ते सगळं फारच सोपं असल्याने मला बाळबोध वाटायचं. (कदाचित मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठी झाल्यानंतर वाचलं असेल!!) याव्यतिरिक्तही घरात बऱ्याच दिवाळी अंकांना “welcome” असायचं. पण ते म्हणजे फक्त उन्हाळी सुट्टीत भेटणाऱ्या बाहेरगावच्या खेळगड्यासारखे; भरपूर मनोरंजन करत वाचनाची आवड सदाबहार ठेवणारे, क्वचित कुणीतरी आठवणीत कायमचे राहून जाणारे.
त्यानंतर, म्हणजे आम्ही साधारण १०-१२ वर्षांच्या झाल्यानंतर, प्रवेश झाला ‘किशोर’ आणि ‘प्रबोधन’ चा! अर्थातच ही मासिकं बालकांसाठी नसून किशोरांसाठी आणि कुमारांसाठी आहेत, त्यामुळे त्याचं वाचनमूल्य आधीच्या “बालमासिक”वर्गीयांशी तुलना करण्यासारखं नाहीच.
'किशोर’ आणि ‘प्रबोधन’मुळे खरंच कितीतरी फरक पडला आणि अजूनही पडतो, “काय वाचावं” याच्या दर्जात. “मोठं होण्याच्या” या टप्प्यावर प्रत्येक मुलामुलीच्या हातात पडलीच पाहिजेत अशी ही मासिकं वाटतात मला. कथा, कविता, लेख, यांच्याच सोबत उत्तमोत्तम चित्रपट आणि पुस्तकांची परीक्षणं, वेगवेगळ्या वस्तू बनवण्याच्या कृती, डोक्याला खाद्य पुरवणाऱ्या विविध स्पर्धा आणि त्यांच्या निकालातून काही अजूनच दर्जेदार; प्रत्येक अंक म्हणजे मेजवानी!!!! पण या दोन्ही मासिकांत मला सर्वाधिक प्रिय असायचं आणि असतं ते म्हणजे “संपादकीय”! ज्ञानदा नाईक (किशोर) आणि महेंद्र सेठीया (प्रबोधन) यांच्या त्या एका संपादकीय लेखासाठी कोणीही अख्खा अंक विकत घ्यावा (आणि नंतर अंकातल्या इतरही लेखनाचा दर्जेदारपणा लक्षात यावा) इतकं मोलाचं!!
या सगळ्याच बाल आणि कुमार मासिकांमधल्या प्रत्येकाला कथांची लेखांची स्वतःची अशी वेगळी शैली किंवा वेगळा प्रकार होता. तशा कथा त्या त्या मासिकाव्यातिरिक्त इतर कुठेही मला वाचायला मिळाल्या नाहीत. (अगदी त्याच लेखकांच्या इतर पुस्तकातून सुद्धा!!) यामागचं गमक मला कधीही उमगलं नसलं तरी वाचनाचा 'तो खास अनुभव' पुन्हा घेण्यासाठी म्हणून ही मासिकं परत परत काढून वाचली जातात. ही सगळी वेगवेगळी मासिकं, अगदी चांदोबा वगैरे पासून प्रबोधनपर्यंत, म्हणजे फक्त वाचनसंस्कार नव्हे तर विविध मार्गांनी “sugarcoated pill” सारखा केलेला ‘जीवनसंस्कार’! त्यांच्या योगाने वाचनाची आणि इतर अनेक छंदांची आवड तर नक्कीच लागते पण त्यासमवेतच कितीतरी जीवनमूल्ये सुद्धा मनात खोलवर रुजतात. घट्ट मूळ धरून नंतर आपल्या कितीतरी निर्णयांना विचारांचा, विवेकाचा आधार देतात.