Sunday, 27 October 2013

लाडकी

सातवी इयत्तेमध्ये प्रथम भाषा मराठी घेऊन शिकताना एका सुंदर मुलीशी ओळख झाली.. गोपाल नीलकंठ दांडेकरांची मानसकन्या "शितू". तेव्हाची ती अर्थात नुसतीच तोंड ओळख. तिला संपूर्णच जाणून घेण्याची उत्सुकता तर अपार होती पण योग काही येत नव्हता. शितूच्या ओढीने गोनीदांच्या इतर अनेक कादंबऱ्या वाचल्या गेल्या. त्यांच्या शैलीवर अक्षरशः प्रेम जडलं. पण शितूच्या भेटीचा योग काही येईना. मध्यंतरी अनेक लोक माझं गोनीदा प्रेम ऐकून "मग तू शितू वाचली असशीलच" असं विचारायचे मला आणि प्रत्येक वेळी नकार देताना जीव अगदी जळायचा माझा.


हल्ली हल्लीच मात्र आमच्या पत्रिका जुळून आल्या आणि एका पुस्तक प्रदर्शनात शितू नजरेस पडली. मग काय शितूला घरी न आणायला काही कारणच नव्हतं आणि एकाच बैठकीत जेमतेम दोनशे पानांची ती "गाथा" वाचून झाली. खरंतर गोनीदांची शैली आणि शितूची कहाणीच अशी आहे की बैठक मोडताच येत नाही. कोकणच्या मातीवर घडणारी त्यांची ही कथा कोकणाला सुद्धा त्यांचा वेगळा स्पर्श देऊन जात असल्याचा भास होतो. लाल मातीवरच्या एकेका बारकाव्याच अचूक निरीक्षण अनुभवताना सुखद आनंद होत राहतो.

शितूच्या प्रस्तावनेत गोनिदांनी शेवटी म्हटलं आहे "चित्तास अति हळुवारपण आणौनिया शितू वाचावी. ती माझी अत्यंत लाडकी परंतु जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे" आणि या त्यांच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी शितू वाचताना आपल्याला काही करावंच लागत नाही. शितूची कहाणी जशी पुढे सरकत जाते तसतसं मन आपोआप हळुवार होत जातं. तिचा स्वभाव सोशिक तर आहेच पण त्यात कुठेही सहन केल्याचा आव नाही. तिचे भोग आपल्या मनाला भिडतात पण तिच्याचमुळे ते सहजही होऊन जातात. 

फार कमी कादंबऱ्या वाचताना मी रडले आहे. शितू अर्थातच त्यात अंतर्भूत होते. शितू वाचताना कुठेच हुंदका येत नाही; डोळे मात्र शितू वाचून पूर्ण झाल्यावरही झरत राहतात. शितूची आठवण इतकी मनावर रेंगाळते की नंतर कित्येक तास मनावरचा पगडा जात नाही.

प्रेमभावनेचा असा पैलू नजरेत येण्यासाठी गोनीदांचीच दृष्टी हवी आणि तो इतरांना दृष्यमान करवण्यासाठी त्यांचीच भाषा हवी. त्यांचा "धन्यतेचा आनंद" शितूच्या एकेका वाक्यात ओतलेला आहे. त्यांच्या "वेदनाशून्य आसवांनी" शितूचा एकेक अध्याय ओथंबलेला आहे. शितू म्हणजे खरोखरंच गोनीदांची सर्वात आगळीवेगळी अशी निर्मिती आहे.

खिळवून ठेवणाऱ्या कित्येक कादंबऱ्या पहिल्यांदाच इतक्या एकाग्रचित्ताने वाचल्या जातात की दुसऱ्यांदा वाचण्याची गरजच उरत नाही. फारफारतर त्यांचा ठराविक प्रसंग उघडावा आणि वाचावा असं होतं. शितूच्या बाबतीत मात्र मी एकदा ती पूर्ण केली, पहिल्याच वेळी तिचा शब्द न् शब्द स्मरणात कोरला गेला. पण तरीही पुनःपुन्हा त्यानंतर मी ती वाचली आणि प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत वाचली.

शितू वाचण्यासाठी मला फार वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण आता मात्र तिच्या पारायणाने कधीच तृप्ती होऊ नये इतकी ती लाडकी झाली आहे.

Wednesday, 11 April 2012

MALTOVA, BOURNVITA, वगैरे....

त्या वाचनाला खरं तर खूप मोठं 'वाचनमूल्य' नसायचं. "आपके बच्चे को बनाये, taller and stronger and sharper" अशा प्रकारचा काही प्रकाशकाचा वायदा/दावा नसायचा. "बच्चेको" वाचनाची चटक लावणं हा आणि एवढाच त्याचा सद्हेतू आणि सदुपयोग. तो मात्र १००% सफल!!
घ री पहिलं मासिक यायचं - अर्थात आम्हा मुलांसाठी असलेलं पहिलं- ते म्हणजे "चांदोबा". बरं, ते यायचं म्हणजे अगदी खास पाहुण्यासारखं. म्हणजे stand वरच्या पेपर-पुस्तकवाल्याकडून जाऊन आणावं लागायचं. आमच्या 'धावे'च्या अंतरात ते बसत नसे. मग बाबांच्या मागे धोशा लावायचा आणि पुरेशा उत्कंठावर्धक प्रतीक्षेनंतर हातात पडलेला चांदोबाचा अंक जेमतेम अर्धा-एक तास पुरायचा. घरात त्यामागून येऊ लागलेल्या बाल-मासिकांच्या मानाने चांदोबाला भरपूर "पोषणमूल्य" होतं. फोटोवरून चारोळी करण्याच्या स्पर्धा, प्रत्येक अंकात वेगवेगळ्या वनस्पतींची तसंच प्रदेशांची माहिती, असं बरंच "पौष्टिक" मालमसाला असायचा. (अर्थात; गोष्टी वाचून संपल्याशिवाय मी बाकी कशाच्या फंदात पडायचे नाही.) त्यातल्या सगळ्याच गोष्टींना तसं तर अलिखित तात्पर्य असायचं, पण त्यातही एकदम वास्तववादी भाष्य करणारे विक्रम-वेताळ माझ्या खास आवडीचे. चांदोबातल्या विक्रम वेताळानी पंचविशी ऐवजी दोनशे पन्नाशी सुद्धा पार करून झालीय (हल्लीच चांदोबाचा कितीतरी 'शे'वा अंक वाचला मी!!!) पण अजूनही ते तितकेच ताजेतवाने असतात. काही दिवसांपूर्वी बाबांच्या नजरेला चांदोबाचा सर्वात नवीन अंक पडला, आणि आमचा हट्ट आठवला म्हणून कि काय, ते तो घेऊनही आले. चांदोबाने आपला दर्जा खूपच टिकवल्याच पाहून बर वाटलं.
बाल-मासिकांशी अजून जास्त मैत्री झाली ती काकांकडे येणाऱ्या इतर मासिकांमुळे. त्यातल्या त्यात “चंपक” जरा जास्तवेळा भेट द्यायचं, “ठकठक” मात्र त्यामानाने अगदीच “ईद का चांद” होतं. पण चांदोबाच्या आकाराशी या दोन्हीच साम्य असलं तरी ती दोन्ही अगदी “बाल” मासिकं वाटायची मला. म्हणजे निखळ मनोरंजनाला (आणि त्यानिमित्ताने वाचनाची आवड लावण्याला) त्यांचं सर्वस्व वाहिलेलं होतं. उगीच आपले चुकार कोडी, चित्रातले फरक ओळखा वगैरे असायचे. सिद्धार्थकाका, चित्रे पूर्ण करून रंगवा; चंपक मध्ये सामान्यज्ञान पण असायचं. अजूनही असतं. पण माझ्या मताने तरी ते सगळं फारच सोपं असल्याने मला बाळबोध वाटायचं. (कदाचित मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठी झाल्यानंतर वाचलं असेल!!) याव्यतिरिक्तही घरात बऱ्याच दिवाळी अंकांना “welcome” असायचं. पण ते म्हणजे फक्त उन्हाळी सुट्टीत भेटणाऱ्या बाहेरगावच्या खेळगड्यासारखे; भरपूर मनोरंजन करत वाचनाची आवड सदाबहार ठेवणारे, क्वचित कुणीतरी आठवणीत कायमचे राहून जाणारे.
त्यानंतर, म्हणजे आम्ही साधारण १०-१२ वर्षांच्या झाल्यानंतर, प्रवेश झाला ‘किशोर’ आणि ‘प्रबोधन’ चा! अर्थातच ही मासिकं बालकांसाठी नसून किशोरांसाठी आणि कुमारांसाठी आहेत, त्यामुळे त्याचं वाचनमूल्य आधीच्या “बालमासिक”वर्गीयांशी तुलना करण्यासारखं नाहीच.
'किशोर’ आणि ‘प्रबोधन’मुळे खरंच कितीतरी फरक पडला आणि अजूनही पडतो, “काय वाचावं” याच्या दर्जात. “मोठं होण्याच्या” या टप्प्यावर प्रत्येक मुलामुलीच्या हातात पडलीच पाहिजेत अशी ही मासिकं वाटतात मला. कथा, कविता, लेख, यांच्याच सोबत उत्तमोत्तम चित्रपट आणि पुस्तकांची परीक्षणं, वेगवेगळ्या वस्तू बनवण्याच्या कृती, डोक्याला खाद्य पुरवणाऱ्या विविध स्पर्धा आणि त्यांच्या निकालातून काही अजूनच दर्जेदार; प्रत्येक अंक म्हणजे मेजवानी!!!! पण या दोन्ही मासिकांत मला सर्वाधिक प्रिय असायचं आणि असतं ते म्हणजे “संपादकीय”! ज्ञानदा नाईक (किशोर) आणि महेंद्र सेठीया (प्रबोधन) यांच्या त्या एका संपादकीय लेखासाठी कोणीही अख्खा अंक विकत घ्यावा (आणि नंतर अंकातल्या इतरही लेखनाचा दर्जेदारपणा लक्षात यावा) इतकं मोलाचं!!
या सगळ्याच बाल आणि कुमार मासिकांमधल्या प्रत्येकाला कथांची लेखांची स्वतःची अशी वेगळी शैली किंवा वेगळा प्रकार होता. तशा कथा त्या त्या मासिकाव्यातिरिक्त इतर कुठेही मला वाचायला मिळाल्या नाहीत. (अगदी त्याच लेखकांच्या इतर पुस्तकातून सुद्धा!!) यामागचं गमक मला कधीही उमगलं नसलं तरी वाचनाचा 'तो खास अनुभव' पुन्हा घेण्यासाठी म्हणून ही मासिकं परत परत काढून वाचली जातात. ही सगळी वेगवेगळी मासिकं, अगदी चांदोबा वगैरे पासून प्रबोधनपर्यंत, म्हणजे फक्त वाचनसंस्कार नव्हे तर विविध मार्गांनी “sugarcoated pill” सारखा केलेला ‘जीवनसंस्कार’! त्यांच्या योगाने वाचनाची आणि इतर अनेक छंदांची आवड तर नक्कीच लागते पण त्यासमवेतच कितीतरी जीवनमूल्ये सुद्धा मनात खोलवर रुजतात. घट्ट मूळ धरून नंतर आपल्या कितीतरी निर्णयांना विचारांचा, विवेकाचा आधार देतात.

Wednesday, 19 October 2011

हर हर महादेव!

लहानपणी राम आणि कृष्ण यांच्या नंतरचे पहिले superhero अर्थातच "क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक मराठी अस्मितेचा अभिमान" असलेले 'राजाधिराज छत्रपती' शिवाजी महाराजच! जाड-बारीक टायपातली त्यांची बरीच पुस्तकं वाचता यायला लागल्यापासून वाचून झाली होती. 'जाणता राजा' पाहताना ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगाला झोपही लागली होती! पण शिवरायांच्या (मला 'शिवाजी महाराज' पेक्षा 'शिवराय' अधिक भारदस्त आणि राजेशाही वाटतं.) चरित्रातली भव्यता आदर्श वाटण्यापेक्षा थोडा धाक, आब आणि अंतर राखणारी वाटली होती.
चौथीनंतरच्या सुट्टीत मी प्रीतमताईकडे काही दिवस राहायला असताना माझ्या हाती 'श्रीमान योगी' लागलं. मी वाचलेली ही बहुधा पहिलीच कादंबरी. अर्थातच 'रणजीत देसाई'सोबत पहिलीच भेट. त्यांची शैली मला तेव्हा फार आवडली याचं कारण बहुतेक हे होतं कि त्यामानाने लहान वयात वाचूनही मला त्या कादंबरीने खिळवून ठेवलं. त्यातला आशय कोणी समजावण्याची तशी गरज भासली नव्हती.

Shriman Yogi : श्रीमान योगी    शिवराय छत्रपती असले तरी सरंजामाआड ते कोणत्याही सामान्य सज्जन माणसासारखे सत्प्रवृत्त होते, सरंजाम ही त्यांची हौस नव्हती. शिवरायांच्या 'क्रियासिद्धिः सत्त्वे' व्यक्तिमत्त्वाची जाणीव मला 'श्रीमान योगी'मुळे अधिक स्पष्टपणे झाली. राजे म्हणून त्यांचं वेगळेपण खूप पुस्तकातून दिसलंय, पण माझ्यासाठी तरी, माणूस म्हणून त्यांचं मोठेपण पहिल्यांदा दाखवलं ते 'श्रीमान योगी'ने. रणजीत देसाईच्या खास अलंकारिक भाषेत शिवरायांच्या आयुष्यातल्या "रम्या कथा" त्यांनी छान विणल्या आहेत.
मी काही या पानावर 'श्रीमान योगी' चं समीक्षण लिहायला नाही लागलेय, पण कथा म्हणून, पुस्तक म्हणून, लिखाणाची शैली वगैरेतून मला जे काही भावलं, स्मरणात ठेवावंसं वाटलं, राहिलं, तेवढं टिपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

अर्थात शिवरायांवरची आणि इतरही काही पुस्तकं वाचल्यानंतर, मला 'श्रीमान योगी'चं अधिक-उणं ही दिसायला लागलं. "ज्यांनी ज्यांनी राजांचे ते बोल ऐकले त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते" अशासारखी काही वाक्यं मग खूप पुस्तकी वाटली (पुस्तकातली वाक्यं, 'पुस्तकी' वाटायला हरकत असू नये खरं म्हणजे!) पण अपेक्षित परिणाम कदाचित त्यांच्याचमुळे साधता आलाय. 
आणि या सगळ्यानंतर, मी स्वतःशी जेव्हा गोळाबेरीज करते, तेव्हाही 'श्रीमान योगी' नक्कीच वाचा असं सांगावंसं नेहमीच वाटतं. वाचनाच्या क्षेत्रात नवखे असणाऱ्यांनाही या कादंबरीचं नाव नक्की माहित असतं. "इतिहास" असं दावा यावर रणजीत देसाई कधी करतच नाहीत; पण ऐतिहासिक व्यक्तीरेखेवरील कादंबरी म्हणून 'श्रीमान योगी' बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. "शिवाजी महाराज" हा विषय हेच बहुतेक यामागचं बलस्थान आहे.

Monday, 10 October 2011

पहिला थेंब

अगदी लहान असताना जेवताना, झोपताना, कधी सहज म्हणून, मला सारख्या आईने गोष्टी सांगायला हवं असे.
आईला वेळ मिळत नसेल तर मग आजोबा. ते घरात नसले तर समोरच्या घरातले आबा. माझ्या सुदैवाने समर्थ आळीतल्या आमच्या घराच्या आजूबाजूला आजी-आजोबांची वाण नव्हती. त्यामुळे या न त्या कुठल्या तरी आजोबांना माझ्यासाठी वेळ काढता यायचाच. मग नव्या जुन्या गोष्टी सांगायला किंवा हीच गोष्ट हवी असा हट्ट धरायला कोणाची आडकाठी?
शाळेत जायला आणि लिहा-वाचायला लागले तरीही मी गोष्टी ऐकत असेच. तिथे तर बाई फळ्यावर चित्र अडकवून चित्रकथा सांगायच्या. पण मग गोष्टीमार्फतच स्वावलंबन वगैरेची जाणीव झाल्यावर आपल्या आपण गोष्टी आणि पुस्तकं वाचायला आणखी मजा यायला लागली.
आणि एकदा लागलेलं वाचनवेड मग कधी गेलंच नाही...
सुरुवातीला मोठ्या जाड टायपातली थोर लोकांची चरित्रं, सोमू-दामूच्या किंवा तेनालीरामच्या गोष्टी वाचून झाल्या. मग ती संपली तसा मोर्चा वळला अभ्यासाच्या, म्हणजे फक्त मराठी किंवा परिसर अभ्यास किंवा फारतर इतिहासाच्या पुस्तकाकडे. पण अभ्यासक्रमात जरी ती वर्षभर असली तरी वाचून पुरी करायला मला काही तास पुरायचे. त्यामुळे त्यापुढची पाळी आली ती ताईच्या पुस्तकांची. तिचं मराठीचं पुस्तक वाचताना 'काय वाचतेय्स' असं बाबांनी हटकल्यावर ' अभ्यासाचं वाचतेय - ताईच्या!' असं उत्तर दिलेलं माझ्या लक्षात आहे. पण तरीही आई बाबांनी माझ्या वाचनाला कधी आडकाठी केली नाही.
ताईची पुस्तकं म्हणजे सुद्धा अक्षयभाता नव्हता. सो, तीही संपायचीच. मग दादाच्या (माझ्या मोठ्या चुलत भावाच्या) पुस्तकांकडे माझा मोहरा वळणं स्वाभाविकच होतं. तो आमच्याकडे हायस्कूल मध्ये असताना होता. 
त्याच्या मराठीच्या पुस्तकाने माझी सोनाली सिंहिणीसारख्या लोकांशी ओळख करून दिली.
सरकत जाणाऱ्या वर्षांनी मग अशा कितीतरी पुस्तकांची तोंड-ओळख, ओळख आणि मैत्री करून दिली. मराठी, इंग्रजी, विविध भाषांतल्या अनुवादित अशा पुस्तकांनी; समीक्षणानी, कवितांनी  भाषांशी स्नेह जडवून दिला. चरित्रं, निबंध, लेखसंग्रह, विनोद, ललित.. बालकथा आणि गोष्टीपासून सुरु झालेल्या माझ्या वाचनाला निषिद्ध किंवा नावडतं असं अजूनही काही नाही.
सर्व प्रकारच्या आणि अनेकविध विषयांच्या पुस्तकांचं वाचन करताना, टिपण काढून ठेवायची सवय मात्र कुठेतरी विरत गेली. काढलेली टिपणं सुद्धा हरवली आणि हळहळ मात्र मागे उरली..
वाचन हा माझ्यासाठी नेहमीच एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवाची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होत राहिलं. पण आता मात्र ब्लॉगमुळे मला वाचलेल्या पुस्तकांची, हरवायला अवघड अशी टिपणं करून ठेवायची एक संधी मिळते आहे. यानिमित्ताने काही पुस्तकं परतही वाचली जातील. काही वाचायची वाचायची म्हणून राहिलेली, काही अर्धवट राहिलेली, सारीच मार्गी लागतील. मराठी वाचनाचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे अर्थातच ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे, पण इतर भाषिक पुस्तकं मात्र वर्ज्य असणार नाहीत. 
लहानपणापासूनच प्रसिद्ध पुस्तकं, चरित्रं, आत्म-चरित्रं, कादंबऱ्या, नाटकं, कविता असं बरंच काय-काय वाचायची संधी मिळालीय मला. या टिपकागदावर त्यातलेच काही थेंब टिपून ठेवायचे आहेत.