Wednesday, 19 October 2011

हर हर महादेव!

लहानपणी राम आणि कृष्ण यांच्या नंतरचे पहिले superhero अर्थातच "क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक मराठी अस्मितेचा अभिमान" असलेले 'राजाधिराज छत्रपती' शिवाजी महाराजच! जाड-बारीक टायपातली त्यांची बरीच पुस्तकं वाचता यायला लागल्यापासून वाचून झाली होती. 'जाणता राजा' पाहताना ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगाला झोपही लागली होती! पण शिवरायांच्या (मला 'शिवाजी महाराज' पेक्षा 'शिवराय' अधिक भारदस्त आणि राजेशाही वाटतं.) चरित्रातली भव्यता आदर्श वाटण्यापेक्षा थोडा धाक, आब आणि अंतर राखणारी वाटली होती.
चौथीनंतरच्या सुट्टीत मी प्रीतमताईकडे काही दिवस राहायला असताना माझ्या हाती 'श्रीमान योगी' लागलं. मी वाचलेली ही बहुधा पहिलीच कादंबरी. अर्थातच 'रणजीत देसाई'सोबत पहिलीच भेट. त्यांची शैली मला तेव्हा फार आवडली याचं कारण बहुतेक हे होतं कि त्यामानाने लहान वयात वाचूनही मला त्या कादंबरीने खिळवून ठेवलं. त्यातला आशय कोणी समजावण्याची तशी गरज भासली नव्हती.

Shriman Yogi : श्रीमान योगी    शिवराय छत्रपती असले तरी सरंजामाआड ते कोणत्याही सामान्य सज्जन माणसासारखे सत्प्रवृत्त होते, सरंजाम ही त्यांची हौस नव्हती. शिवरायांच्या 'क्रियासिद्धिः सत्त्वे' व्यक्तिमत्त्वाची जाणीव मला 'श्रीमान योगी'मुळे अधिक स्पष्टपणे झाली. राजे म्हणून त्यांचं वेगळेपण खूप पुस्तकातून दिसलंय, पण माझ्यासाठी तरी, माणूस म्हणून त्यांचं मोठेपण पहिल्यांदा दाखवलं ते 'श्रीमान योगी'ने. रणजीत देसाईच्या खास अलंकारिक भाषेत शिवरायांच्या आयुष्यातल्या "रम्या कथा" त्यांनी छान विणल्या आहेत.
मी काही या पानावर 'श्रीमान योगी' चं समीक्षण लिहायला नाही लागलेय, पण कथा म्हणून, पुस्तक म्हणून, लिखाणाची शैली वगैरेतून मला जे काही भावलं, स्मरणात ठेवावंसं वाटलं, राहिलं, तेवढं टिपून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

अर्थात शिवरायांवरची आणि इतरही काही पुस्तकं वाचल्यानंतर, मला 'श्रीमान योगी'चं अधिक-उणं ही दिसायला लागलं. "ज्यांनी ज्यांनी राजांचे ते बोल ऐकले त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते" अशासारखी काही वाक्यं मग खूप पुस्तकी वाटली (पुस्तकातली वाक्यं, 'पुस्तकी' वाटायला हरकत असू नये खरं म्हणजे!) पण अपेक्षित परिणाम कदाचित त्यांच्याचमुळे साधता आलाय. 
आणि या सगळ्यानंतर, मी स्वतःशी जेव्हा गोळाबेरीज करते, तेव्हाही 'श्रीमान योगी' नक्कीच वाचा असं सांगावंसं नेहमीच वाटतं. वाचनाच्या क्षेत्रात नवखे असणाऱ्यांनाही या कादंबरीचं नाव नक्की माहित असतं. "इतिहास" असं दावा यावर रणजीत देसाई कधी करतच नाहीत; पण ऐतिहासिक व्यक्तीरेखेवरील कादंबरी म्हणून 'श्रीमान योगी' बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. "शिवाजी महाराज" हा विषय हेच बहुतेक यामागचं बलस्थान आहे.

Monday, 10 October 2011

पहिला थेंब

अगदी लहान असताना जेवताना, झोपताना, कधी सहज म्हणून, मला सारख्या आईने गोष्टी सांगायला हवं असे.
आईला वेळ मिळत नसेल तर मग आजोबा. ते घरात नसले तर समोरच्या घरातले आबा. माझ्या सुदैवाने समर्थ आळीतल्या आमच्या घराच्या आजूबाजूला आजी-आजोबांची वाण नव्हती. त्यामुळे या न त्या कुठल्या तरी आजोबांना माझ्यासाठी वेळ काढता यायचाच. मग नव्या जुन्या गोष्टी सांगायला किंवा हीच गोष्ट हवी असा हट्ट धरायला कोणाची आडकाठी?
शाळेत जायला आणि लिहा-वाचायला लागले तरीही मी गोष्टी ऐकत असेच. तिथे तर बाई फळ्यावर चित्र अडकवून चित्रकथा सांगायच्या. पण मग गोष्टीमार्फतच स्वावलंबन वगैरेची जाणीव झाल्यावर आपल्या आपण गोष्टी आणि पुस्तकं वाचायला आणखी मजा यायला लागली.
आणि एकदा लागलेलं वाचनवेड मग कधी गेलंच नाही...
सुरुवातीला मोठ्या जाड टायपातली थोर लोकांची चरित्रं, सोमू-दामूच्या किंवा तेनालीरामच्या गोष्टी वाचून झाल्या. मग ती संपली तसा मोर्चा वळला अभ्यासाच्या, म्हणजे फक्त मराठी किंवा परिसर अभ्यास किंवा फारतर इतिहासाच्या पुस्तकाकडे. पण अभ्यासक्रमात जरी ती वर्षभर असली तरी वाचून पुरी करायला मला काही तास पुरायचे. त्यामुळे त्यापुढची पाळी आली ती ताईच्या पुस्तकांची. तिचं मराठीचं पुस्तक वाचताना 'काय वाचतेय्स' असं बाबांनी हटकल्यावर ' अभ्यासाचं वाचतेय - ताईच्या!' असं उत्तर दिलेलं माझ्या लक्षात आहे. पण तरीही आई बाबांनी माझ्या वाचनाला कधी आडकाठी केली नाही.
ताईची पुस्तकं म्हणजे सुद्धा अक्षयभाता नव्हता. सो, तीही संपायचीच. मग दादाच्या (माझ्या मोठ्या चुलत भावाच्या) पुस्तकांकडे माझा मोहरा वळणं स्वाभाविकच होतं. तो आमच्याकडे हायस्कूल मध्ये असताना होता. 
त्याच्या मराठीच्या पुस्तकाने माझी सोनाली सिंहिणीसारख्या लोकांशी ओळख करून दिली.
सरकत जाणाऱ्या वर्षांनी मग अशा कितीतरी पुस्तकांची तोंड-ओळख, ओळख आणि मैत्री करून दिली. मराठी, इंग्रजी, विविध भाषांतल्या अनुवादित अशा पुस्तकांनी; समीक्षणानी, कवितांनी  भाषांशी स्नेह जडवून दिला. चरित्रं, निबंध, लेखसंग्रह, विनोद, ललित.. बालकथा आणि गोष्टीपासून सुरु झालेल्या माझ्या वाचनाला निषिद्ध किंवा नावडतं असं अजूनही काही नाही.
सर्व प्रकारच्या आणि अनेकविध विषयांच्या पुस्तकांचं वाचन करताना, टिपण काढून ठेवायची सवय मात्र कुठेतरी विरत गेली. काढलेली टिपणं सुद्धा हरवली आणि हळहळ मात्र मागे उरली..
वाचन हा माझ्यासाठी नेहमीच एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवाची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होत राहिलं. पण आता मात्र ब्लॉगमुळे मला वाचलेल्या पुस्तकांची, हरवायला अवघड अशी टिपणं करून ठेवायची एक संधी मिळते आहे. यानिमित्ताने काही पुस्तकं परतही वाचली जातील. काही वाचायची वाचायची म्हणून राहिलेली, काही अर्धवट राहिलेली, सारीच मार्गी लागतील. मराठी वाचनाचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे अर्थातच ब्लॉग मूळ मराठीतच असणार आहे, पण इतर भाषिक पुस्तकं मात्र वर्ज्य असणार नाहीत. 
लहानपणापासूनच प्रसिद्ध पुस्तकं, चरित्रं, आत्म-चरित्रं, कादंबऱ्या, नाटकं, कविता असं बरंच काय-काय वाचायची संधी मिळालीय मला. या टिपकागदावर त्यातलेच काही थेंब टिपून ठेवायचे आहेत.