Wednesday, 10 June 2015

युगंधर

"मृत्युंजय" बद्दल आधी लिहावं आणि नंतर "युगंधर" बद्दल, असं डोक्यात ठेवून मी गेले सहा महिने थांबले होते.. पण आता मात्र गप्प बसवत नाहीये अगदीच.

शिवाजी सावंत यांची एकूण ३ पुस्तकं मी वाचलीयेत. सगळी "Epic"! मृत्युंजय, छावा, आणि आता युगंधर. मृत्युंजय वाचलं तेव्हा फक्त 'एक प्रसिद्ध पुस्तक' आणि 'आवर्जून वाचलं पाहिजे असं पुस्तक' असं बोलबाला ऐकून वाचायला घेतलं. मग सावंतांच्या शैलीची छापच उमटली मनावर. (मृत्युंजय बद्दल वेगळं लिहायचंच आहे.) त्यानंतर संभाजीराजे यांच्यावरची धूळ झटकणारं (खरंतर त्यांच्यावरचे डाग स्वच्छ करणारं) पुस्तक अशी "छावा" ची कीर्ती वाचली आणि ते सुदैवाने घरात आलेलंच असल्याने पटकन वाचून सुद्धा झालं ("छावा" हा अर्थातच अजून एक स्वतंत्र विषय!). 'युगंधर'ची कीर्ती कानावर येत होती पण वाचनाचा योग जमून येत नव्हता. welll, आधीच अशी फार वर्षं वाट पाहिलेली असल्याने असेल पण 'युगंधर' हातात आल्यापासून साधारण १६ तासात ते सलग वाचून झालं (जेवणखाण ज्या त्या वेळेत हो!). 



युगंधर वाचण्याआधी यावर
एक नजर टाकायलाच हवी!
प्रस्तावनेपासून सुरुवात करायची असा माझा शिरस्ता. कुसुमाग्रज लाडके कवी होतेच (अजूनही आहेत किंबहुना) पण या 'युगंधर'मागे त्यांचं मोलाचं प्रोत्साहन आहे हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पट वाढला. शिवाजी सावंतांनी पुस्तक लिहिताना किती वेळ आणि किती वेळा break घेतला ते वाचून वाटायला लागलं की या मानाने माझा हे पुस्तक 'वाचायचा' योग नक्कीच लवकर आलाय. (LOL!) इतक्या चिकाटीने, इतकी वर्षं; अभ्यास, काम करणे आणि ते ही अशा प्रकारचं प्रतिभाजन्य काम... म्हणूनच अशा कलाकृती काळात अमर होऊन जातात बहुतेक! (वाक्य जरा जड झालंय, पण नाइलाज!)

'युगंधर' वाचताना मला अनेक ठिकाणी 'मृत्युंजय' चा sequel वाचत असल्यासारखं वाटत होतं. पण त्याला कदाचित पर्याय नसावा. काही ठिकाणी तर चक्क "वाचकाने आधी मृत्युंजय वाचलं असणार" असं सरळ गृहीत धरलेलं जाणवतं. पण मला वाटतं, हजार पानाचं पुस्तक वाचायला घेणारा वाचक किमान इतका अभ्यासू आणि रसिक असण्याची अपेक्षा हा उलट वाचकावर दाखवलेला विश्वास आणि त्याचा सन्मानच आहे.

मुळात मला 'युगंधर' 'भयंकर' आवडला त्याला कारण म्हणजे पहिल्यांदाच कुणा लेखकाने, श्रीकृष्णाकडे एक 'शाश्वत', 'मर्त्य' आणि 'मानव' म्हणून पाहत कथानकाची मांडणी केली आहे. त्याचे काही 'चमत्कार' कायम ठेवताना सुद्धा त्याच्यातला 'मनुष्यजन्म' जपला आहे. मला वाटतं, "दशावतार" मुळात अपेक्षित आहेत ते असेच.
त्यातल्यात्यात श्रीरामाच्या वागण्यात (आणि कथेत) आपल्याला बरेच मानवी संदर्भ सापडतात; पण बिचारा 'पूर्णपुरूष' श्रीकृष्ण मात्र आपण फारच परका, अमानवी करून टाकला आहे. भागवत पुराण असो व अजून कुठलं पुस्तक, श्रीकृष्णाचे चमत्कार गाण्यातच आपल्या लेखकांना धन्यता वाटत आली आहे. युगंधर मात्र या कसोटीवर पूर्ण वेगळा सिद्ध होतो. (अर्थात तसं प्रस्तावनेत स्पष्ट म्हटलेलंच आहे आणि त्या शब्दाला पुस्तक जागतं सुद्धा.)

श्रीकृष्णाचे आणि महाभारतातील इतर चमत्कार (द्रौपदी वस्त्रहरणासारखे प्रसंग, संजयच्या दिव्यदृष्टीचा प्रसंग, इ.) 'युगंधर' ला वर्ज्य नाहीत. पण श्रीकृष्णाचे गोकुळातील पराक्रम, त्याचे सर्वज्ञ असणे - त्याचे सजग आणि उत्कृष्ट गुप्तहेरखाते, त्याचे रुक्मिणीसोबतचे नाते, स्यमंतक घटनाक्रम, त्याचे प्रथम आठ विवाह, रुक्मिणीच्या आणि राण्यांच्या जबाबदाऱ्या, अर्जुनासोबत आणि कर्णासोबतचे संवाद, भगवद्गीता, युद्ध, युद्धानन्तरचा काळ, यादवांचा अंत या सगळ्यांमध्ये श्रीकृष्णाचे 'दिव्य' असण्यापेक्षा,  राज्यकर्ता आणि माणूस म्हणून वैचारिक दृष्ट्या प्रगत असणे प्रत्येक वेळी प्रतिबिंबित होते.

मथुरेचा, द्वारकेचा, भारतवर्षातील इतर प्रदेशांचा आणि राज्याभागांचा भौगोलिक संदर्भ अभ्यासपूर्ण असल्याचं जाणवतंच पण पुस्तकातले नकाशे सहज औत्सुक्याने पहिले जातात, त्यांचे संदर्भ लावले जातात; दुर्लक्षित केले जात नाहीत, हे महत्त्वाचं. प्रत्येक निवेदक आधीच्या घटनाक्रमाचा थोडक्यात पण आपल्या दृष्टीकोनातून आढावा घेतो आणि मगच पुढे सरकतो. पण या सगळ्या भानगडीत कधी कधी (थोडासा) कंटाळा येऊ शकतो (म्हणजे उगाच 'आपण सगळ्यांच्या बाजू ऐकून निकाल द्यायचा आहे' अशी भावना व्हायला लागते). पण त्यासुद्धा, काही निवेदक काय म्हणतात याबद्दल उत्सुकता वाटत राहते - दारुक, कर्ण किंवा द्रौपदी सारखे... दारुकाचे निवेदन कृष्णाचे सेवकवर्गाशी असलेले वागणे निर्देशित करतेच शिवाय त्याची अश्वतज्ञता आणि म्हणून कुशल सारथी अशी कीर्ती (जी सहसा इतर कोणत्याही महाभारताच्या पुस्तकात युद्धापूर्वी उल्लेखात येत नाही!) ती दर्शवते. कर्णाचे निवेदन मृत्युंजयच्या जवळ जाणारे असले तरीही वेगळे (निवेदकाचे कथेच्या मध्यवर्ती स्थानापासूनचे अंतर वेगळे असल्याने असावे बहुतेक). द्रौपदीचं निवेदन बऱ्याच अर्थांनी युगंधरमध्ये महत्त्वाचं आहे. आणि तिने केलेल्या पांडवांच्या स्वभावांवरील परीक्षणाशी मी तरी फारच सहमत होते. रुक्मिणीचं निवेदन हा मला वाटत 'युगंधर'ला 'मृत्युंजय'पासून वेगळं नेणाऱ्यापैकी एक महत्त्वाचा पैलू. तिचा श्रीकृष्णाकडे बघण्याचा दृष्टीकोन 'पतीपरमेश्वराय..' असला तरीही त्यांच्या नात्यातला बंध सुखावणारा. यादवांचा अंत किंचित अतिरंजित वाटतो, पण किंचितच आणि त्यातसुद्धा असलेली तर्कशुद्धता अपूर्व आहे.

भगवद्गीता तर इतक्या सुरेख आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य (कथा-कादंबऱ्या वाचून धन्य होणाऱ्या) वाचकाला सुद्धा गीता-सार वाचल्याचा आनंद आणि ज्ञान मिळावं. कादंबरी म्हणून मांडताना सुद्धा गीतेचं महत्त्व कायम राखत ती टाळली तर नाहीच पण उगाच क्लिष्टदेखील केलेली नाही.

पण माझ्या मते, सर्वात सुंदर उत्तरे मिळतात ती दोन शंकांना. 
मला फार पूर्वीपासून (अगदी भौतिक) प्रश्न होता की श्रीकृष्ण द्रौपदीच्या स्वयंवराला कसा काय आमंत्रित होता? (i mean, स्वयंवराचे आमंत्रित हे त्यात भाग घेण्यासाठीच असतात असं आपलं माझं मत झालेलं... आणि "द्रौपदीसी बंधू शोभे.." हा विरोधाभास!) आणि दुसरं म्हणजे, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न; सोळा हजार राण्या??????? (काहीही काय!) पण या दोन्हीला युगंधरने दिलेली उत्तरं चपखल आणि वादातीत आहेत. ते ही श्रीकृष्णाचा मानवजन्म आणि त्याचा मोठेपणा दोन्ही सांभाळून. (काही नाही तर यासाठी तरी - हजार पानाचं असलं तरी ही - युगंधर आवर्जून वाचावं!)

प्रसंगी, 'उंगली टेढी करणारा' श्रीकृष्ण मला (त्यासाठी) आधीच आवडत होता; आणि मुलगी म्हणून मला (पत्नीला परित्यक्ता जगायला लावणाऱ्या) श्रीरामापेक्षा, (सोळा हजार स्त्रिया सोडवणारा) श्रीकृष्ण सुद्धा आवडत होताच. पण त्याहीपेक्षा, या प्रश्नांची अशी काही उत्तरे देऊन जाणारा युगंधर अधिकच आदरणीय होतो. आणि फक्त तेवढी उत्तरेच नाही तर त्याचा 'स्त्रीपुरुषसमभाव' यापेक्षा कितीतरी खोलवर जाणारा, अधिक गंभीर आणि अधिक नित्यसहज आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांनीच खरंतर त्याच्या 'सोळा हजार स्त्रिया' आणि पूर्ण'पुरूषत्व' यापलीकडे जाऊन त्याच्यातले हे समभावाचे 'पूर्ण'गुण समजून घेण्याची आत्यंतिक गरज सध्याच्या घडीला दिसते आहे. श्रीकृष्णाच्या मोरपिसापासून ते श्रीवत्स चिह्न आणि शंख, चक्रापर्यंत प्रत्येक गोष्टीचे अधिक तर्कशुद्ध समर्थन हे 'युगंधर'चं अतिमहत्त्वाच बलस्थान आहे.

"स्त्री", "पुरुष" या संकल्पना माणसांना लागू होतात (देवांना केवळ देव आणि देवी एवढा सम्बोधनातला दुजाभाव स्वीकृत आहे असं दिसतं) याचे दाखले आपल्या पौराणिक साहित्यात जागोजाग आढळतात. त्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाच अतिमानुष (किंबहुना अमानुष) पूर्णपुरूषत्व मला फार काळ खटकत होतं. पण शिवाजी सावंतांचा श्रीकृष्ण "दैवी" पेक्षा "मानवी" स्वरुपात जास्त असतो. सगळ्या समस्यांना तो मानुष उत्तरं देतो. प्रत्येक वेळी सिद्ध करतो की तो 'पूर्णपुरूष' म्हणवला जातो कारण तो प्रगत असूनही 'मनुष्य' होता.

राधेचा सखा, द्रौपदीचा सखा बंधू आणि बलरामासाठी लहान, पती, मुलगा, एक निस्पृह कार्यकारी राज्यकर्ता, एक मार्गदर्शक, युद्धनीतीज्ञ, आणि एक विरागी सुद्धा.

प्रत्येक रुपात युगंधर लोभावतो तो एक माणूस म्हणून.